*शेतकऱ्यांनी स्वत:च्या विकासाबरोबर जिल्हयाच्या विकासासाठीही पुढे यावे*
-जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे
उस्मानाबाद. दि. 9:- उस्मानाबाद जिल्हयात विकासासाठी नवनवीन मार्ग उपलब्ध होत आहेत. त्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सूचना प्राप्त होत आहेत. अशा परिस्थितीत या योजनांचा अभ्यास करुन, समजून घेवून शेतकऱ्यांनी स्वत:च्या विकासाबरोबरच जिल्हयाच्या विकासासाठीही पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज येथे केले.
श्री. तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथील जिल्हा कृषी महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा परिषदेच्या सदस्य उषा उर्फ सुरेखा यरकळ, नवनाथ अप्पा जगताप, जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष चोले, प्रकल्प संचालक (आत्मा) केशव मलगुंडे, कृषी विकास अधिकारी डॉ. चिमणशेटये आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गमे म्हणाले की, या जिल्हयात शेतकरी संघटित होऊन खूप चांगले काम होवू शकते. या जिल्हयात शेतकरी गट, शेतकरी कंपन्या याबाबतचे संघटनात्मक काम उत्तम झाले आहे मात्र त्या तुलनेने दृश्य स्वरुपाचे काम दिसून येत नाही. जिल्हयात जलयुक्त शिवारची कामे चांगली झाली आहेत, आता पिक पध्दतीवर लक्ष देवून समजून काम करणे आवश्यक आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी आपल्या भविष्याचा विचार करुन आधुनिक पीक पध्दती, अवजारे, यांत्रिक ज्ञान मिळवून शेती विकास आणि पर्यायाने जिल्हयाचा विकास घडवावा, असे श्री. गमे यांनी शेवटी सर्व उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन केले.
या उद्घाटन सोहळयाप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांचीही समयोचित भाषणे झाली.
यावेळी गौरवशाली शेतकऱ्यांचा, पत्रकारांचाही यथोचित सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये भिमराव शेंडगे-काजळा, अनुपमा कुलकर्णी-नळदूर्ग, प्रकाश चव्हाण-अणदुर, धनंजय घोटाले-तावशीगड, आनंदराव देशमुख-ईट, तात्यासाहेब गोरे-आंतरगाव, भैरवनाथ ठोंबरे-रांजणी, पांडुरंग आवाड-आवाडशिरपुरा, दत्तप्रसाद उर्फ राजेंद्र मुंदडा-शिराढोण, श्रीमती शकुंतलाबाई मारेकर-माडज, श्रीमती केशरबाई भागुडे-म्होतरवाडी, श्रीमती गीता चव्हाण-म्होतरवाडी, श्रीमती सुरेखा जाधव-चिलवडी, श्रीमती किरण निंबाळकर-उस्मानाबाद, सुभाष कदम-पानवाडी, सुधाकर जाधवर-ताडगाव, तसेच शेतकरी गटामध्ये लोककल्याण फुड उत्पादक शेतकरी गट पाडोळी संजय पवार, मुख्यमंत्री मित्र रेशीम उत्पादक गट पाडोळी बालाजी पवार, कृषी वैभव शेळी फार्म क. तडवळे धनाजी नाळे, कृषी सखी महिला शेतकरी गट देवसिंगा अर्चना भोसले, जय भगवान शेतकरी गट सोनगिरी धर्मराज कुटे, ओडिएसएफ शेतकरी उत्पादक कंपनी वरुडा ॲड अमोल रणदिवे, व्हीआरडी शेतकरी उत्पादक कंपनी सारोळा कैलास पाटील, एनएनजी शेतकरी उत्पादक कंपनी कानेगाव नितीन घुले, भवानी शंकर शेतकरी उत्पादक कंपनी बारुळ सुधीर सुपनर, मराठवाडा शेतकरी उत्पादक कंपनी कळंब बाळासाहेब गिते, पत्रकार मल्लिकार्जून सोनवणे, प्रज्योत मसाले प्रॉडक्ट्सच्या ज्योती सपाटे, शिवार संसद आणि शेतकरी मित्र केंद्राचे विनायक हेगाणा, आनंद डिजीटलचे धनंजय शिंदे, जगदंबा एन्टरप्राईजेसचे हनुमंत वडवले, कॉन्ट्रॅक्टर सचिन भिसे, पोरे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने तसेच जागृती फौंडेशन जनसेवा कलापथकाच्या सिध्दार्थ सावंत आणि सहकार्यांच्या शेतकरी गीत गायनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष चोले तर आभार प्रदर्शन प्रकल्प संचालक (आत्मा) केशव मलगुंडे आणि सूत्रसंचालन आशीष लगाडे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप शेतकरी गीताने करण्यात आला.
हा कृषी महोत्सव दि. 9 ते 13 मार्च या कालावधीत होणार असून जास्तीत-जास्त संख्येने या महोत्सवास शेतकऱ्यांनी, जनतेने आवर्जून भेट द्यावी, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.
या कार्यक्रमास सर्व शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, शेतकरी, पत्रकार बांधव यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment