उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संशयित रूग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मात्र तो रूग्ण कोरोनाचा नसल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक राजाभाऊ गलांडे यांनी दैनिक जनमतशी बोलताना सांगीतले.
याबाबत माहिती अशी की, हा रूग्ण गेल्या काही दिवसात पिंपरी चिंचवड येथे कामानिमीत्त नातेवाईकांकडे गेला होता.समुद्रवाणी येथे गावी परतल्यानंतर केवळ ती व्यक्ती पिंपरी चिंचवड आणि पुणे येथून प्रवास करून आल्याने त्यांना समुद्रवाणी येथील आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेले असता डॉक्टरांनी उस्मानाबाद येथे त्यांना पाठवले. मात्र उस्मानाबाद येथे जिल्हा रूग्णालयात कोरोना वार्डच बंद असल्याने त्यांना काही काळ ताटकाळत उभे रहावे लागले. यातून जिल्हा आरोग्य यंत्रणेची बेफिकीरी दिसून आली. केवळ ढिसाळ यंत्रणेमुळे त्या रूग्णाला ताटकाळत उभे रहावे लागले अशी चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसापूर्वी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला होता त्यात त्यांना यंत्रणा सज्ज असल्याचे सांगीतले गेले . तसेच आज पालकमंत्री शंकरराव गडाख यांनीही आढवा घेतला त्यांनाही यंत्रणा सज्ज असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र एका आलेल्या रूग्णाने शासकीय यंत्रणेचा कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार उघड केला आहे. मात्र अनाहुतपणे घडलेले हे मॉक ड्रील जिल्हा यंत्रणेला धडा शिकवून जाणारे आहे. त्या रूग्णाची तातडीने तपासणी न करणार्या डॉक्टरांवर काय कारवाई होते हे आता पहावे लागणार आहे. खरच त्या व्यक्तीला जबरदस्तीने दवाखान्यात पाठवण्यात आले आहे का याची माहिती समुद्रवाणी येथील जबाबदार नागरीकांना विचारली असता त्यांनी ते काल पुण्याहून आले आहेत. थोडीशी सर्दी आणि खोकला त्यांना होता मात्र तपासणीसाठी तयार नसल्याने त्यांचे शेजारी आणि नातेवाईकांनी दवाखान्यात पाठवले आहे असे गावकर्यांनी सांगीतले. तसेच त्या व्यक्तीला कोणतीही लक्षणे नसताना समुद्रावानी येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी रुग्णाला उस्मानाबाद येथे का पाठवले असा प्रश्न विचारला जात आहे.
ती व्यक्ती ठिकठाक- जिल्हा शल्यचिकीत्सक
समुद्रवाणी येथून आलेली व्यक्ती ठिकठाक असून त्यांच्यामधे कोरोनाची कोणतीच लक्षणे नाहीत. ते पिंपरी चिंचवड येथून प्रवास करून आल्याने त्यांना नातेवाईकांनी जबरदस्तीने दवाखान्यात पाठवले होते. त्यांची तपासणी केली आहे. कोरोनाची कोणतीच लक्षणे न आढळल्याने त्यांना गावी पाठण्यात येणार आहे. लक्षणे नसल्याने विलगीकरण कक्षात ठेवण्याची गरज नसल्याचे तसेच आरोग्य यंत्रणेने तपासणीसाठी कुचराई न केल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक राजाभाऊ गलांडे यांनी सांगीतले.