उस्मानाबाद - तालुक्यातील पाडोळी येथे काही दिवसांपूर्वी कोरोना बाधित रुग्ण आढळून आला होता त्या कारणाने खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी गावास भेट दिली मात्र या भेटी दरम्यान रुग्णाचा नातेसंबंध असलेल्या तसेच जिल्हा परिषदेच्या माजी आरोग्य सभापती आणि सध्या होम क्वारंटाईन असलेल्या गावातील बड्या नेत्याने उपस्थिती लावल्याने गावात भीतीदायक वातावरण आहे. विशेष म्हणजे याच भेटीत गावातील उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी देखील उपस्थित असल्याने आरोग्य विभाग जनजागृती करत आहे की नाही असा प्रश्न गावकऱ्यांना पडत आहे. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता "आम्ही बाधिताच्या संपर्कातील १६ व्यक्तींना क्वारंटाईन केले आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतीकडे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली."
तसेच घडलेल्या प्रकाराबाबत गावातील जागरूक नागरिकांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना अवगत केल्याची माहिती दैनिक जनमतशी बोलताना दिली. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागातही रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. लोकप्रतिनिधी दायित्वाच्या भूमिकेतून गाव भेटी देत आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वर्धक गोळ्यांचे वाटप करत आहेत.परिस्थितीचा आढावा घेत आहेत मात्र या भेटीदरम्यान अनावश्यक गर्दी वाढत असल्याने पुढील धोका वाढत आहे.