तासगाव प्रतिनिधी
:म्हैसाळ उपसा सिंचन योजना यावर्षी मार्च ते मे अखेर तीन महिन्यांसाठी उन्हाळी आवर्तना दरम्यान सुरु होती. पावसाचे आगमन झालेनंतर योजना बंद करण्यात आलेली होती. गतवर्षी कृष्णा नदीला पूर आलेला होता व अतिरीक्त पाणी वाहून गेले होते. त्याअनुषंगाने पूर परिस्थिती दरम्यान वाहून जाणारे अतिरीक्त पाणी म्हैसाळ योजनेद्वारे उचलून कायमस्वरुपी दुष्काळी भाग असलेल्या तासगाव, कवठेमहांकाळ, जत, सांगोला, मंगळवेढा या तालुक्याच्या लाभक्षेत्रातील तलाव व बंधारे भरुन घेतलेस पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे असे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी सूचीत केले होते. त्यानुसार जलसंपदा विभागामार्फत याबाबत कार्यवाही करणेसाठी आवश्यक सर्व यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे. सद्यस्थितीत कृष्णा नदीला पूरसदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पाहता मा. मंत्री महोदयांनी म्हैसाळ योजना आज दि. १७ ऑगस्ट २०२० पासून कार्यान्वित करुन योजनेच्या लाभक्षेत्रातील कायमस्वरुपी दुष्काळी तालुक्यातील सर्व तलाव व बंधारे भरणेबाबत सूचना जलसंपदा विभागाच्या अधिका-यांना दिल्या. यामध्ये साधारणपणे २.५० टि.एम.सी पाणी उचलून लाभक्षेत्रातील ३० मोठे तलाव, ५०पाझर तलाव व ५० बंधारे भरण्याचे नियोजन आहे. त्यानुसार सदर योजना आज दि. १७ ऑगस्ट २०२० पासून कार्यान्वित होत आहे.