उस्मानाबाद - जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत आणि तुळजापूर चे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यामध्ये सध्या सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा जोर धरत आहे. या संघर्षाची सुरुवात पालकमंत्री सावंत यांनी जिल्हा परिषद मधील कामांना स्थगिती देण्याची मागणी केल्याच्या पत्रानंतर सुरू झाली. जिल्हा परिषदेत भाजप आणि सावंत गट यांची सत्ता असताना त्याच काळातील कामांना स्थगितीची मागणी केल्याने उलट सुलट चर्चाना उधाण आले होते. त्यानंतर या सुप्त संघर्षाचा दुसरा टप्पा आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या बैठकीचा त्यात देखील पालकमंत्र्यांच्या मतदार संघात अधिकची कामे नेण्यात आल्याची देखील चर्चा होती. सुप्त संघर्षाचा तिसरा टप्पा नुकताच घडला असून तुळजापुरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याच्या नियोजन विभाग प्रधान सचिवांना पत्र लिहीत जिल्हा वार्षिक योजनेच्या अंतर्गत निधी वाटपात असमतोल असल्याचे म्हटले आहे. या पत्रानंतर मात्र हा सुप्त संघर्ष थोडा पुढे गेला आहे. दोन्ही नेत्यांनी अद्याप याबद्द्ल जाहीर विधान केलेले नाही. मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील कोणत्याही कार्यक्रमात एकत्र देखील दिसलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात दोन्ही नेत्यात नेमकं काय सुरू आहे याचा अंदाज त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील येत नाही. त्यामुळे हा सुप्त संघर्ष आहे की खुला विरोध आहे की सारं काही आलबेल आहे हे उभयतांनी जाहीर केल्यानंतर समजेल.